जेव्हा एक अभियंता (इंजिनिअर) भाजीचा व्यवसाय करतो तेव्हा



अमरावतीतील दर्यापूरचा महेंद्र टेकाडे हा अभियांत्रिकीचा पदवी धारक, पदवीनंतर काही काळ नोकरी केली,मात्र घरची शेती पुन्हा गावाकडं घेऊन आली. महेंद्र मॅकेनिकल इंजिनिअरिंग अाहेत. मात्र, नोकरीच्या मागे न लागता शेतीतच भरीव काही करण्याचा त्यांचा मानस होता. याच ध्येयाने वाटचालही सुरू केली. मोठ्या व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा शेतीतील मालाचं ब्रान्डिंग करण्याचं ठरवलं. आणि हा व्यवसाय उभा राहिला.
सध्याच्या धकाधकीच्या युगात लोकांना मंडईत जाऊन शेतमालाची खरेदी करण्यापेक्षा तो घरपोच मिळाला तर हवा असतो. काळाची हीच गरज अमरावती येथील महेंद्र टेकाडे या तरुणाने अोळखली. आज शहरातील सुमारे १५०० ग्राहकांना तो विविध प्रकारचा भाजीपाला-फळे घरपोच पुरवत आहे. त्यासाठी मनुष्यबळ व यंत्रणेचे नेटवर्क उभारून ‘भाजी बाजार’ व्यवसाय उभारून त्यातून रोजगारनिर्मिती केली आहे.
व्यवसाय उभारणीपूर्वी महेंद्रनं शहरातील 500 घरांमध्ये सर्व्हे केला. कुटुंबांची रोजची भाजीची गरज जाणून घेतली. आणि त्यांच्या गरजेनुसार भाजी पुरवण्याचं नियोजन केलं. महेंद्र यांची सुमारे १४ एकर शेती आहे. भाऊ रवींद्र ती पाहतात. त्यामुळे शेतीतील समस्या, संधी, कल महेंद्र यांना माहीत होतेच. आजकाल कामांच्या व्यस्ततेमुळे लोकांना घरपोच शेतमाल हवा असल्याची गरज त्यांनी अोळखली. त्यातून घरपोच विक्रीची कल्पना पुढे आली.
त्याने ६ डिसेंबर २०१५ पासून भाजी बाजार सुरू केला. या आधी निवडक पाचशे ग्राहकांपर्यंत जाऊन त्यांना घरपोच भाजीपाला दिला तर आवडेल का ? त्यानंतर सर्व कार्यपद्धत समजावून सांगून महेंद्र व त्याच्या टीमने ५०० ग्राहक तयार केले. या ग्राहकांना आपल्या घरी बसूनच ताजी भाजी व फळे किती पाहिजे हे फोन करूनच ऑर्डर दिल्या जाते. या व्यतिरिक्त व्हाट्सअपवर ही भाजीची मागणी ग्राहक करू शकतात.
ग्राहकाच्या गरजेनुसार रोज भाजीपाल्याचं नियोजन केलं जातं. शेतकऱ्यांकडून भाजी विकत घेतली जाते. ही भाजी महिला स्वच्छ करतात. ग्राहकांच्या गरजेनुसार भाजीच्या पिशव्या भरल्या जातात. ही भाजी ग्राहकांच्या दारापर्यंत पोहचवण्यासाठी वातानुकुलित व्हॅन आणि दुचाकी आहे. ज्याव्दारे ही भाजी थेट ग्राहकाच्या घरात पोहचते.
भाजी व फळे ही रोजच्या आहारासाठी निगडित घटक असल्यामुळे शेतकऱ्यांकडून भाजी खरेदी केल्यानंतर ती पहिले स्वच्छ करण्यात येते. त्यातील काडी, कचरा बाजूला करण्यात येतो. त्यानंतर ऑर्डर प्रमाणे पुरविल्या जाते. ग्राहकाकडून भाजीसंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधित डिलेव्हरी देणाऱ्या व्यक्तीला विचारणा ही केल्या जाते.
ग्राहकांचे समाधान करुन सकाळी ९ ते दुपारी २ व त्यांनतर ३ ते रात्री ८ पर्यंत घरपोच भाजी पुरविल्या जाते. भाजी आणि फळे खरेदी करण्याची जवाबदारी दीपक आणि गणेश यांच्याकडे असून सकाळी शेतकऱ्यांकडून आलेला माल मोजून खरेदी करतात.
9 महिन्यापूर्वी 500 ग्राहकांपासून सुरु केलेला भाजी बाजार आज दीड हजार ग्राहकांपर्यंत पोहचलाय. महेंद्रनं 13 युवक आणि युवतींना रोजगार दिलाय. तर कित्येक शेतकऱ्यांनाही त्यांच्या मालाचा योग्य दर मिळतोय. महेंद्र या व्यवसायातून दररोज 8 ते 9 हजार रुपये कमावतोय. म्हणजेच महिन्या अडीच लाखांची उलाढाल.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार