गुंतवणूक करताना समजून घेण्यासारखे काही मुलभूत मुद्दे



१) महागाई - महागाई चा दर जसा वाढत जातो तसे आपल्याला आपण केलेल्या गुंतवनुकीमधून परतावा भेटणे आवश्यकच आहे, आज महगाई चा दर हा १५ % आहे असे समजूया व दर साल महागाई हि दुप्पट किंवा त्या पेक्षा जास्त वाढ असेल तर आपल्या परतावा हा त्याच्याच जवळपासच्या दराने झाला पाहिजे.
२) घर किंवा मालमत्ता घेणे - ह्यासाठी आपली आर्थिक बाजू मजबूत पाहिजे कारण घर किंवा इतर मालमत्ता ह्यांचा व्यवहार हा लाखांचा असतो आणि जर कर्ज घेतले तर गाढवासारखे काम करतच राहावे लागेल, आपल्या अनेक इच्छांवर पाणी सोडावे लागेल, हे मी माझ्या पगारी मित्र मैत्रिणींचे जगणे जवळून बघत आहे.
३) मुलांचे शिक्षण, लग्न
४) उच्च राहणीमान ह्यामध्ये गाडी, पार्टी, सहल (राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय), महागड्य वस्तू व इतर.
५) आरोग्य
६) मुलभूत गरजा
७) म्हातारपण
जर आपल्याकडे पैसा आणि वेळ असेल तर उत्तम गुंतवणूक करून वयाच्या ३५ ते ४० पर्यंत निवृत्त होवून आपल्या स्वप्नांचे आयुष्य जगू शकाल, आर्थिक व्यवहाराला पैसा आणि वेळ हा द्यावाच लागतो.
ज्यांनी ९० च्या दशकात भविष्य ओळखून गुंतवणूक केली ते लोक २० आणि काही १० वर्षातच करोडपती झाले, कारण ९० नंतर काळ हा थोडा वेगाने बदलत होता व २००० उजाडताच बदल हा अत्यंत वेगाने व्हायला सुरवात झाली, जे मुक्त विचारांचे होते, मानसिक दृष्ट्या सक्षम होते ते टिकून राहिले, आणि जे गाफील होते ते मुंबई बाहेर आणि आता तर बदलापूर आणि टीटवाळा ह्या स्टेशनच्या पुढपर्यंत फेकले गेले.
जे कधी काळी उच्च मध्यमवर्गीय होते ते आता कनिष्ठ मध्यम वर्गीय झाले. असो निसर्गाचा नियम आहे कि जो काळानुसार बदलत जातो तोच जगतो, बाकी विरोध करणारे कमजोर होत जात संपून जातात. थोडे आजू बाजूला निरीक्षण केल्यावर आपल्याला जाणवून येईल.
शेअर, मुच्युअल फंड, कमोडीटी, मालमत्ता, सोने चांदी (किंवा इतर धातू कारण भारतापेक्षा जास्त सोने चीन आयात करतो, भारतात ते सोने जमा करून ठेवले जाते आणि चीन मध्ये ते सोने इलेक्ट्रोनिक्स मध्ये वापरले जाते, सोने विकत घेताना ते आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीनेच विकत घ्या), बॉंड, फिक्स डीपोझीट व शेवटी पोलिसी ह्यामधील जी गुंतवणूक जास्त परतावा देते ती वरच्या क्रमवार ठेवा व त्यानंतर एक एक करून खालील क्रम लावा. गुंतवणूक हि दीर्घ काळासाठी केलेली बरी पण आपल्याला हे आयुष्य काही गॅरंटी देवून भेटलेले नाही इथे कधीही काहीही होऊ शकते म्हणून आपल्या गुंतवणुकीवर लक्ष्य ठेवत जा.
जसे तुम्ही कृती करत जाल तसे तुम्ही शिकत जाल, मग त्यामधील कठीण शब्द पण समजत जातील. बाजार वर जात असेल तर गुंतवणूक आहे तितकीच करत जा, आणि जेव्हा बाजार खाली जाईल तेव्हा जास्त गुंतवणूक करत जा आणि खाली जाण्याचा तळ गाठलेला बाजार हा गुंतवणूक करण्यासाठी अतिशय उत्तम असतो.
ह्या जगामधली प्रत्येक गोष्ट शेअर बाजार सुद्धा मानसिकतेवर अवलंबून आहे. आपण जर थोडा अभ्यास अजून वाढवला तर कंपन्यांनी घेतलेले आंतरराष्ट्रीय कर्ज व त्याचा दर, तेलाच्या किमती, डॉलर च्या किमती, त्या त्या देशातील निवडणुका, त्या कंपनीतील उच्च पदाधिकारी, मालक, नवीन सौदा व इतर अनेक जे गुंतवणुकीला परिणामकारक ठरू शकतात अश्या घटनांवर आपल्याला लक्ष्य ठेवावे लागते, ह्या गोष्टी जर आपण आत्मसात करू शकलो तर एक प्रकारे तुम्ही वर्तवलेले प्रत्येक भाकीत खरे ठरू शकते.
आर्थिक व्यवहार करताना नेहमी आपले मन आणि मेंदू हा शांत ठेवावा लागतो मग भले तो एक रुपयाचा व्यवहार असो किंवा १ अब्जचा, माझ्या कडे सल्ला किंवा प्रशिक्षणासाठी आलेल्यांची गुंतवणूक वाढली व काहींचे नुकसान कमी झाले आणि हे फक्त त्यांच्या भावना शांत केल्यामुळे झाले. प्रत्येकाकडे क्षमता असते पण ती भावनिक वादळामुळे झाकली जाते.
गुंतवणूक जरी दीर्घ पल्ल्याची असली तरी आपण वर्तमानात जगत असतो त्यामुळे थोडी रक्कम आपल्या जीवनशैली नुसार वापरत जाल. भविष्यासाठी आपण वर्तमान संपूर्णपणे नाकारू शकत नाही, माझे सर्वांना एकच म्हणणे आहे कि आपले स्वप्नांचे आयुष्य झोपेत किंवा भविष्यात नका जगू, वर्तमानात जगा.
शेवट हे बोलू संपवतो कि आपल्या मुलांना लहानपणापासून आर्थिक व्यवहारांचे धडे द्या जेणे करून मोठ्यापनी ते सन्मानाने जगू शकतील.
धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया ८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार