प्रत्येकाला स्वतःसाठी वेळेची गरज असते आणि शांत एकांतता ताण कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. पण जेव्हा एकाकीपण नकळत किंवा जबरदस्तीने तुमच्यावर लादले जाते, तेव्हा ते एक संपूर्ण वेगळे रूप धारण करते. अशा वेळी, त्याचे परिणाम आश्चर्यकारकपणे व्यापक असू शकतात. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे परिणाम जाणवत असले, तरी व्यक्ती जेवढी जास्त काळ एकटी राहते, तितकी लक्षणे अधिक तीव्र आणि दीर्घकालीन होत जातात. जेव्हा कोणाला अनिश्चित काळासाठी—काही दिवस, आठवडे, महिने किंवा वर्षांसाठी—एकाच जागेत, एकटे आणि कोणत्याही उत्पादनक्षम कामाशिवाय डांबून ठेवले जाते, तेव्हा त्यांच्या शरीरात अनेक बदल घडण्याची शक्यता असते. नक्की काय घडते आणि का घडते, ते पाहूया.
सुरुवातीच्या काळात ताणाची हार्मोन्स झपाट्याने वाढू शकतात आणि वेळ निघून जाईल
तसा हा ताण जुनाट (क्रॉनिक) बनू शकतो. भावनिक स्थिरतेसाठी सामाजिक संवाद आणि
अर्थपूर्ण उपक्रम अत्यंत आवश्यक आहेत. याचे कारण असे असू शकते की ते आपल्याला
संशोधक ज्याला "सोशल रियॅलिटी टेस्टिंग" म्हणतात ते प्रदान करतात—एक
प्रकारचा असा व्यासपीठ जिथे आपण आपल्या विचारांची आणि भावनांची तर्कसंगतता तपासू
शकतो. त्यामुळे, जेव्हा एखाद्या व्यक्तीला
अशा प्रकारच्या संवादापासून आणि कामांपासून वंचित ठेवले जाते, तेव्हा त्याच्या आत्मभानाला आणि वास्तववादाला धोका निर्माण
होतो. त्यांचे विचार भरकटू लागतात आणि त्यांच्या भावनांवरचा ताबा सुटतो, ज्यामुळे नैराश्य, तीव्र मानसिक चिंता, आत्महत्येचे
विचार आणि काही लोकांमध्ये भ्रम व भास (hallucinations) होण्याची परिस्थिती निर्माण होते.
काळानुसार, हा दीर्घकालीन मनस्ताप
मेंदूच्या 'लिंबिक सिस्टम'ला (जी भीती आणि ताण नियंत्रित करते) अत्यंत संवेदनशील आणि
अतिसक्रिय बनवू शकतो. दरम्यान, 'प्रीफ्रंटल
कॉर्टेक्स'—जो मेंदूचा विचार आणि नैतिक
निर्णयाचा केंद्रबिंदू आहे—आकुंचन पाऊ शकतो, ज्यामुळे व्यक्तीची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि
ज्ञानग्रहणाची क्षमता मंदावते. एकूणच, समतोल हा
तर्कसंगत विचारांकडून भावनिकतेकडे झुकतो. आणि व्यक्ती जशी या स्थितीत राहते, तसा हा असंतुलन अधिक दृढ होतो, ज्यामुळे ती व्यक्ती चिंता, राग आणि अवाजवी कृतींना सहज बळी पडते.
एकाकीपणाचा परिमाण व्यक्तीच्या आरोग्याच्या इतर भागांवरही होतो. ते वेळेची
जाणीव गमावू शकतात आणि त्यांना झोपेच्या समस्या उद्भवू शकतात. त्यांना हृदयाची
धडधड वाढणे, डोकेदुखी, चक्कर येणे आणि अतिसंवेदनशीलतेचा त्रास होण्याची शक्यता
जास्त असते. ताणामुळे उद्भवणाऱ्या पचनाच्या समस्या आणि भूक न लागण्यामुळे त्यांचे
वजनही घटू शकते.
या टोकाच्या परिस्थितीतही शक्य तितकी निरोगी दिनचर्या (जसे की व्यायाम, वाचन आणि लेखन) ठेवून परिस्थितीचा सामना करण्याचा प्रयत्न
केला जाऊ शकतो. पण त्याचीही एक मर्यादा असते. संयुक्त राष्ट्र (UN), अनेक मानवाधिकार संघटना आणि तज्ज्ञ या प्रकारच्या सक्तीच्या, दीर्घकालीन एकांताला 'छळ' (torture) म्हणून
वर्गीकृत करतात. तरीही, अनेक देशांतील
कैद्यांना या परिस्थितीला सामोरे जावे लागते.
याला "सोलिटरी कन्फाइनमेंट" किंवा "रिस्ट्रिक्टिव्ह
हाऊसिंग" देखील म्हटले जाते, आणि ही पद्धत
युनायटेड स्टेट्समध्ये (अमेरिका) सर्वाधिक सामान्य आहे. २०१९ मध्ये, १,२०,००० हून अधिक अमेरिकन कैदी एकांतवासात राहत होते, जे साधारणपणे ६ बाय ९ फूट आकाराच्या, मुख्यत्वे खिडक्या नसलेल्या खोल्यांमध्ये दिवसातील २२ ते २४
तास घालवत होते. १७०० च्या उत्तरार्धात क्वेकर (Quaker) गटांनी शारीरिक शिक्षेला पर्याय म्हणून अमेरिकन तुरुंगात एकांतवासाची सुरुवात
केली. त्यांच्या मते यामुळे आत्मचिंतन आणि पश्चात्ताप होऊ शकतो—म्हणूनच
"पेनिटेंटरी" (तुरुंग) हे नाव पडले. परंतु या पद्धतीवर लवकरच टीका होऊ
लागली, अगदी प्रसिद्ध
व्यक्तींपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वांनीच यावर आक्षेप घेतला.
उदाहरणार्थ, चार्ल्स डिकन्स यांनी
एकांतवासाचा निषेध करताना म्हटले होते की हे "शरीराच्या कोणत्याही छळापेक्षा
वाईट" आहे.
याचा वापर कमी झाला होता, परंतु १९८०
च्या दशकात, अधिक कडक आणि
गुन्हेगारीविरोधी कायद्यांमुळे अमेरिकेतील तुरुंगांमधील कैद्यांची संख्या प्रचंड
वाढली. तुरुंगात गर्दी वाढल्यामुळे निदर्शने, बंड आणि हिंसाचाराच्या घटना वाढल्या आणि तुरुंग प्रशासनाने नियंत्रण
ठेवण्यासाठी एकांतवासाचा वापर वाढवला. तुरुंगाधिकाऱ्यांशी वाद घालण्यासारख्या
किरकोळ, गैर-हिंसक उल्लंघनांसाठीही
अनेक लोकांना एकांतवासात ठेवण्यात आले आहे. एकांतवास हा सर्वांसाठीच हानिकारक आहे, परंतु ज्यांना आधीपासूनच मानसिक आजार आहेत, त्यांच्यासाठी तो अधिकच धोकादायक ठरतो आणि त्यांची स्थिती
अधिक बिघडवतो.
एकांतवासाचे असे दीर्घकालीन परिणाम होतात ज्यामुळे तुरुंगाच्या बाहेर सामान्य
आयुष्यात पुन्हा जुळवून घेणे कठीण होते. एकांतवासातून गेलेल्या लोकांमध्ये
पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD)
ची लक्षणे दिसण्याची शक्यता तीन पटीने जास्त असते. ते सहसा त्यांच्या
व्यक्तिमत्त्वात बदल, सामान्य
परिस्थितीतही वाढलेली चिंता आणि भीती, आणि इतरांशी
संवाद साधण्यात किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येत असल्याचे सांगतात.
काही राज्यांनी गंभीर मानसिक आजार,
मुले किंवा गरोदरपणाच्या प्रकरणांमध्ये एकांतवासाच्या वापरावर बंधने आणली आहेत, तर काहींनी सर्वांसाठी १५ किंवा २० दिवसांची मर्यादा
निश्चित केली आहे. परंतु एकांतवासाचे नियमन करणारे कायदे नेहमी लागू केले जात
नाहीत—आणि तुरुंग प्रशासनाने यात पळवाटा शोधल्या आहेत. तरीही, एकांतवास पुनर्वसनाच्या उद्देशाला हरताळ फासून अफाट नुकसान
करतो आणि तुरुंगातील हिंसाचार कमी करण्यातही अपयशी ठरतो.
दरम्यान, इतर देशांनी अधिक मानवी
दृष्टिकोन स्वीकारला आहे. नॉर्वे, उदाहरणार्थ, अमेरिकेच्या तुलनेत प्रतिमाणशी खूप कमी लोकांना तुरुंगात
टाकतो, तर राहण्याची सोय, वर्ग आणि काम-मुक्तता कार्यक्रमांवर प्रति कैदी पाच पट
जास्त खर्च करतो. नॉर्वेमध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर लोक पुन्हा गुन्हेगारीकडे
वळण्याचे प्रमाण जगातील सर्वात कमी आहे (Recidivism rate), जे हे दर्शवते की आपण एकत्र राहूनच सुधारू शकतो.
अश्विनीकुमार
0 आपले विचार